घरगुती गॅस सिलिंडरची सतत दरवाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता महागाईने त्रासली आहे. गॅस सिलिंडरचे वाढते दर सर्वसामान्यांना परवडत नसल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी पुन्हा एकदा शेत, जंगलाची वाट धरली आहे. महिलांना भर उन्हात शेतात वणवण करत जळणासाठी सरपण मिळविण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने गोरगरिबांची पंचाईत झाली आहे. त्याचबरोबर गॅसची सबसिडी बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील महिला चुलीकडे वळताना दिसत आहे.
सबसिडी बंद झाल्याने सर्वसामान्यांना गॅस परवडेना
घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८५० रुपयांवर पोहोचली असून त्यात अतिरिक्त गाडीभाडे द्यावे लागत आहे. ग्रामीण भागातील हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य गरिबांना, कष्टकरी महिलांना या सिलिंडर परवडत नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून पुन्हा चुलीकडे वळावे लागत आहे. पुन्हा सरपणाचा शोध, उसाची खोडवी, शेणाच्या गोवऱ्या, झाडांच्या वाळलेल्या फांद्या तोडून त्या रचून ठेवण्यामध्ये महिलावर्ग मग्न आहेत.
किमती आवाक्याबाहेर
१०० रुपयांत उज्ज्वला गॅसची जोडणी मिळत असल्याने सुरुवातीच्या काळात या योजनेला उत्तम प्रतिसादही मिळाला, परंतु सिलिंडरच्या किमती दरवाढ आवाक्याबाहेर गेल्याने आपली चूलच बरी अशी भावना गरीब कुटुंबांतील महिलांची होत आहे.
पैसे नसल्याने सिलिंडर घ्यायचे तरी कसे ?
उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर आणि शेगडी सरकारकडून मिळाली, परंतु ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना एकदा संपलेले सिलिंडर पुन्हा घेण्यासाठी पैसेच नसल्याने त्यांना ते रिफिल करता येत नाही.
त्यातही सबसिडी बंद झाली आहे. त्यामुळे योजनेचा मूळ उद्देश बाजूला पडला आहे. गॅस सिलिंडर घेणे परवडत नसल्याने ग्रामीण भागातील जनता पुन्हा चुलींचा आधार घेत आहे.
सरपणासाठी महिला जंगलात भटकंती करत असल्याचे चित्र वाडी तांड्यावरील दुर्गम खेड्यापाड्यात बघायला मिळत आहे.