मंडळी महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने १ एप्रिलपासून अपात्र रेशन कार्डधारकांविरुद्ध विशेष शोध मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम एक महिना राबवली जाणार असून, त्यामध्ये बेकायदेशीरपणे रेशन कार्ड मिळवलेल्यांची चौकशी केली जाईल. विशेषतः बांगलादेशी घुसखोर किंवा इतर विदेशी नागरिक जर रेशन कार्ड घेतल्याचे आढळले, तर ते कार्ड तत्काळ रद्द करण्यात येईल.
राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासंबंधीचे आदेश नुकतेच शुक्रवारी जाहीर केले आहेत. अंत्योदय, केशरी आणि शुभ्र या सर्व प्रकारच्या रेशन कार्डधारकांची तपासणी केली जाणार आहे. जे कार्डधारक अपात्र ठरतील, त्यांची नोंद रद्द करण्यात येईल.
या मोहिमेअंतर्गत प्रत्येक रेशन दुकानदाराला एक विशेष तपासणी फॉर्म दिला जाणार आहे. या फॉर्मच्या आधारे अपात्र व्यक्ती ओळखता येतील. तपासणी दरम्यान, कार्डधारकांनी दिलेला वास्तव्याचा पुरावा कमीत कमी एक वर्ष जुना असावा, अशी अट ठेवण्यात आली आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत ही तपासणी केली जाणार आहे. जे नागरिक वास्तव्याचा योग्य पुरावा सादर करू शकणार नाहीत, त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात येईल. या कालावधीत पुरावा न दिल्यास संबंधितांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल.
अशा ठिकाणी, जिथे एका पत्त्यावर दोन रेशन कार्ड आढळतील, तिथे एकच कार्ड वैध धरले जाईल व दुसरे रद्द केले जाईल. तसेच, शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी कर्मचारी ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांच्याकडे केशरी किंवा पिवळे कार्ड आहे, त्यांना अपात्र ठरवून त्यांच्या उत्पन्नानुसार योग्य प्रकारचे रेशन कार्ड दिले जाणार आहे.
या मोहिमेमुळे मृत व्यक्तींचे रेशन कार्ड, तसेच दुबार कार्डेही प्रणालीतून वगळली जातील, जेणेकरून खरे लाभार्थी लाभ घेऊ शकतील.