मित्रांनो गेल्या काही वर्षांत रस्ते अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक निष्पाप जीव वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेले आहेत. यामुळे सरकारने कठोर पावलं उचलून गोटार वाहन दंड कायदा २०२५ लागू केला आहे. हा कायदा १ मार्च २०२५ पासून अंमलात आला असून त्यानुसार वाहतूक नियम तोडणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागणार आहे. काही नियमांचं उल्लंघन केल्यास तुरुंगवास आणि समाजसेवेचीही शिक्षा होणार आहे.
हेल्मेट घालणं किती आवश्यक आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. आता हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना पकडल्यास १००० रुपये दंड आणि ३ महिन्यांसाठी लायसन्स रद्द केलं जाईल. यापूर्वी केवळ १०० रुपये दंड आकारण्यात येत होता, त्यामुळे अनेकांना या नियमाचं गांभीर्य वाटत नव्हतं.
दुचाकीवर चालक आणि एक प्रवासी या दोन व्यक्तींव्यतिरिक्त जर अधिक प्रवासी आढळले, तर १००० रुपये दंड भरावा लागेल. यापुढे असे नियम तोडणं केवळ चुकीचं नाही, तर खिशालाही चटका लावणारे ठरणार आहे.
चारचाकी चालवताना सीट बेल्ट न लावल्यास आता थेट १००० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. याआधी फक्त १०० रुपये दंड होता. सीट बेल्ट हा आपल्या सुरक्षेसाठीच आहे, हे प्रत्येकाने लक्षात घेणं आवश्यक आहे.
रस्त्यावर सिग्नल तोडणं ही फार मोठी चूक मानली जाणार असून आता त्यासाठी ५००० रुपये दंड आकारला जाईल. सिग्नल न पाळणं म्हणजे अपघातांना आमंत्रण देणं आहे.
गाडी चालवत असताना मोबाईल वापरणं, फोनवर बोलणं यासाठीही आता ५००० रुपये दंड निश्चित करण्यात आला आहे. ही एक गंभीर चूक असून अनेक अपघातांचे मूळ कारण हेच असतं.
जास्त वेगाने गाडी चालवणं, स्टंट करणं किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालवणं यासाठी देखील ५००० रुपये दंड लागणार आहे. रस्त्यावर स्टंट दाखवणाऱ्यांसाठी हा थेट इशारा आहे.
दारू पिऊन वाहन चालवल्यास आता १०,००० रुपये दंड किंवा ६ महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा दिली जाऊ शकते. पुन्हा तसंच केल्यास दंड १५,००० रुपये होईल आणि २ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
आपत्कालीन सेवा जसे की रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा निर्माण केल्यास १०,००० रुपये दंड आकारला जाणार आहे. अशा सेवेला अडथळा करणे हा गंभीर गुन्हा मानला जाणार आहे.
ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास आता ५००० रुपये दंड लागेल. त्याचप्रमाणे, वाहन विमा नसल्यास २००० रुपये दंड आणि/किंवा ३ महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.
१८ वर्षांखालील मुलांनी गाडी चालवली, तर त्यांचे पालक जबाबदार धरले जातील. त्यांना २५,००० रुपये दंड, ३ वर्षांचा तुरुंगवास आणि त्या वाहनाची नोंदणी एका वर्षासाठी रद्द केली जाईल. त्याच मुलास वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जाणार नाही.
या नव्या नियमांमुळे वाहतुकीतील शिस्त वाढेल आणि अपघातांचं प्रमाण निश्चितच कमी होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे. नियम पाळणं ही केवळ कायदेशीर जबाबदारी नाही, तर आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठीही आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे पालन करावं आणि जबाबदारीने वाहन चालवावं.